तारापूर औद्योगिक क्षेत्रात एका आठवड्यात दोन महिला कामगारांवर दुर्दैवी घटना
तारापूर औद्योगिक क्षेत्रात एका आठवड्यात दोन महिला कामगारांवर दुर्दैवी घटना
बोईसर – तारापूर एमआयडीसी औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांमध्ये महिला कामगारांच्या सुरक्षेची स्थिती किती धोकादायक आहे, याचे जिवंत उदाहरण एका आठवड्यात घडलेल्या दोन दुर्दैवी घटनांतून दिसून आले आहे. यात एक महिला गंभीर जखमी झाली तर दुसरीचा मृत्यू झाला असून, औद्योगिक सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
रविवारी, ३ ऑगस्ट रोजी, ऋषिकेश सिल्क मिल (प्लॉट क्र. एल-७५) या कारखान्यात सफाई कामगार मंजू यादव (वय ४१) काम करत असताना त्यांची साडी मशीनमध्ये अडकली. यात त्या मशीनमध्ये ओढल्या गेल्याने त्यांच्या डाव्या मांडीला गंभीर मार बसून आठ टाके पडले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
शुक्रवार, ८ ऑगस्ट रोजी, शेत्रुंजय डाईंग अँड विविंग मिल्स लिमिटेड (प्लॉट क्र. D-1) या कारखान्यात काम करणाऱ्या अभिलाषा दीपक आचार्य (वय २८) यांना घोणस प्रजातीच्या सापाच्या पिल्लाने चावा घेतला. प्रकृती खालावल्याने रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
या घटनांनंतर महिला कामगारांमध्ये भीतीचे व असंतोषाचे वातावरण पसरले आहे. सुरक्षाविषयक साधनांची कमतरता, अपुऱ्या सुविधा आणि निष्काळजीपणाबाबत प्रशासन व कारखानदारांनी तातडीने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे. अन्यथा अशा घटना पुन्हा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Comments
Post a Comment