शेतातील गंजलेला वीज खांब जीवघेणा ठरणार? महावितरणच्या हलगर्जीवर प्रश्नचिन्ह

शेतातील गंजलेला वीज खांब जीवघेणा ठरणार? महावितरणच्या हलगर्जीवर प्रश्नचिन्ह

बोईसर : तारापूर माळी स्टॉप येथील शेतकरी गंगाधर माळी यांच्या शेतात उभा असलेला वीज वाहक तारांचा खांब तळाशी पूर्णतः गंजून धोकादायक स्थितीत पोहोचला आहे. वादळी वारा व पावसात तो कोणत्याही क्षणी कोसळू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात असून, शेतकरी गंगाधर माळी यांनी महावितरणच्या उदासीनतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. "दुर्दैवी घटना घडल्यानंतरच महावितरणचे अधिकारी जागृत होतील का?" असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

गंगाधर माळी यांनी संबंधित देलवाडी महावितरण कार्यालयात तक्रार अर्ज सादर करून खांबाची जीर्ण स्थिती निदर्शनास आणून दिली होती. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांनी अजूनपर्यंत याची दखल घेतलेली नाही. या निष्काळजीपणामुळे शेतकरी, शेतमजूर, जनावरे किंवा इतर नागरिक यांच्या जिवाला धोका निर्माण होण्याची शक्यता असून, कधीही अनर्थ घडू शकतो.


◾शेतकऱ्यांचा संताप अनावर 

"महावितरणचे अधिकारी जीवितहानी होईपर्यंत वाट पाहत आहेत का?" असा थेट सवाल गंगाधर माळी यांनी केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, जर काही अनुचित घटना घडली, तर यासाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे.


◾सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

 ही समस्या केवळ एकाच शेतकऱ्याची नसून, तारापूर परिसरात आणि किनारपट्टी व ग्रामीण भागात अशा धोकादायक स्थितीतील वीज खांबांची संख्या शेकड्यांनी आहे. महावितरण वीज बिल वसुलीसाठी आक्रमक असते, मात्र देखभाल-दुरुस्तीच्या बाबतीत मात्र प्रचंड दुर्लक्ष केले जात असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे नागरिक व शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.


◾तात्काळ उपाययोजना कराव्या 

गंगाधर माळी यांच्या तक्रारीनंतरही कोणतीही हालचाल न झाल्याने परिसरातील इतर शेतकरीही संतप्त आहेत. महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून अशा धोकादायक वीज खांबांची पाहणी करून कार्यवाही करावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.


या गंभीर मुद्द्यावर प्रशासनाने त्वरीत पावले उचलली नाहीत, तर भविष्यात जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, हे वास्तव शेतकऱ्यांनी अधोरेखित केले आहे.

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

आंबटगोड मैदानातील खून प्रकरणाचा उलगडा; सात जणांना अटक

रेल्वे रुळ ओलांडताना ट्रेनच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू