खाऊगल्लीतील अनधिकृत बांधकामांमुळे वाहतूक कोंडी व अपघाताचा धोका वाढणार
खाऊगल्लीतील अनधिकृत बांधकामांमुळे वाहतूक कोंडी व अपघाताचा धोका वाढणार
ग्रामसभेत नागरिकांच्या संतप्त भावना व्यक्त"
बोईसर – बोईसर ग्रामपंचायत हद्दीतील खाऊगल्ली परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर बांधकामांमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनत चालला असून, यावर नुकत्याच पार पडलेल्या ग्रामसभेत जोरदार गोंधळ झाला. स्थानिक नागरिकांसह राजकीय प्रतिनिधींनीही ग्रामपंचायतीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
ग्रामसभेत बहुजन समाज पक्षाचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांनी थेट ग्रामपंचायतीवर डोळेझाक केल्याचा आरोप करत सांगितले की, “मार्जिन स्पेसमध्ये अनधिकृत स्ट्रक्चर्स उभे राहत आहेत. संध्याकाळच्या वेळेस खाऊगल्ली परिसरात होणारी वाहतूक कोंडी सामान्य जनतेला प्रचंड त्रासदायक ठरते.”
भाजपचे स्थानिक पदाधिकारी अशोक वडे यांनी यासंदर्भात ग्रामपंचायतीच्या भूमिकेवर आक्षेप घेत विचारले, “जेव्हा हे बांधकाम बेकायदेशीर आहे, तर ग्रामपंचायतीने यासाठी नाहरकत दाखला का दिला?” असा थेट सवाल करत ग्रामपंचायतीच्या कार्यपद्धतीवर शंका उपस्थित केली.
दरम्यान, ग्रामपंचायतीच्या प्रभारी सरपंच निलम संखे यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, “मार्जिन स्पेसमध्ये अनधिकृत बांधकाम केल्यास लवकरच संबंधितांना नोटीस पाठवून आवश्यक ती कायदेशीर कारवाई केली जाईल.”
स्थानिक नागरिकांत या मुद्द्यावरून प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली असून ग्रामपंचायतीने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात येत आहे. अन्यथा जनतेचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Comments
Post a Comment