पालघर पोलिसांची मोठी कारवाई : विक्रमगड येथे गांजासह दोघे अटकेत, ७ लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त
पालघर पोलिसांची मोठी कारवाई : विक्रमगड येथे गांजासह दोघे अटकेत, ७ लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त
पालघर : अंमली पदार्थ विरोधात पालघर पोलिसांनी सुरू केलेल्या कठोर मोहिमेअंतर्गत विक्रमगड येथे मोठ्या प्रमाणात गांजाची वाहतूक उघडकीस आली आहे. स्थानिक गुन्हे शाखा पालघर व विक्रमगड पोलीस ठाण्याच्या संयुक्त कारवाईत दोघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून सुमारे ७ लाख ५ हजार १६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई १३ जून रोजी सायंकाळी ८.४५ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांनी पालघर जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांना अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यानुसार पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विक्रमगड-जव्हार रोडवरील यशवंतनगर गावाजवळ सापळा रचला होता. गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.
या दरम्यान, जव्हार बाजूकडून आलेली वेरणा कार (क्रमांक GJ-15/CO-4644) थांबवून तपासणी केली असता, तिच्या डिक्कीत १०.२५८ किलो वजनाचा गांजा आढळून आला, ज्याची किंमत सुमारे २ लाख ५ हजार १६० रुपये इतकी आहे. याशिवाय, वापरलेली वेरणा कार सुमारे ५ लाख रुपये किमतीची असून, एकूण जप्त मुद्देमालाची किंमत ७ लाख ५ हजार १६० रुपये इतकी झाली आहे.
या कारवाईत सतिश लक्ष्मण वाघ (५२ वर्षे) आणि सागर सोमनाथ बलसाने (२९ वर्षे) या दोघांना अटक करण्यात आली असून, ते दोघेही नाशिक येथील कुंभारवाडा भागातील रहिवासी आहेत. पोलिसांनी त्यांच्यावर एन.डी.पी.एस. कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून, विक्रमगड पोलीस ठाण्यात गु.र.नं. १८३/२०२५ प्रमाणे कारवाई नोंदवण्यात आली आहे. आरोपींना प्रथमवर्ग न्यायालय, जव्हार यांनी १७ जून २०२५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या पथकात सहा.पो.नि. रविंद्र पारखे, पो.उ.नि. रविंद्र वानखेडे, गोरखनाथ राठोड, भगवान पाटील तसेच पो.ह.वा. दिलीप जनाठे, संतोष निकोळे, संजय धांगडा, उत्तम बिरारी, शिवाजी भोईर यांच्यासह पो.अ.मं. प्रशांत निकम, विशाल कडव, संदीप कुवरा, भालचंद्र भोये, सुशिल बांगर हे अधिकारी व कर्मचारी सहभागी होते.
पालघर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अवैध अंमली पदार्थांशी संबंधित कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ पोलीस ठाण्यात कळवावी. माहिती देणाऱ्याची गोपनीयता राखली जाईल, तसेच अशा अवैध प्रकारांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे उच्चाटन आणि युवकांना नशेपासून दूर ठेवणे हे पालघर पोलिसांचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.
Comments
Post a Comment