सगीता केमिकल प्रा. लि. च्या उत्पादनावर बंदी
पर्यावरण नियमांचे उल्लंघन केल्याने MPCB ची कारवाई
तारापूर – तारापूर औद्योगिक क्षेत्रातील एन-३/४ मध्ये असलेल्या सगीता केमिकल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या उत्पादनावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (MPCB) कडक कारवाई करत बंदी घातली आहे. येत्या ४८ तासांत कारखान्याची पाणी आणि वीज जोडणी खंडित करण्याचे आदेश महावितरण व उद्योग विभागाला लेखी स्वरूपात देण्यात आले आहेत.
२ फेब्रुवारी २०२५ रोजी, कारखान्याच्या उत्पादनादरम्यान निर्माण होणारे घातक रासायनिक पाणी लगतच्या मोकळ्या भूखंडावर खुलेआम सोडले जात असल्याचे निरीक्षण उपप्रादेशिक अधिकारी राजू वसावे आणि क्षेत्रीय अधिकारी विश्वजीत सोरगे यांनी केले होते. या गैरप्रकारामुळे परिसरातील ओहोळांमध्ये रासायनिक पाण्याचे प्रवाह पाम व कुंभवली गावाच्या दिशेने वाहताना दिसून आले होते.
सदर प्रकार अनेक दिवसांपासून सुरू असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सखोल चौकशी करून वसावे यांनी वरिष्ठ कार्यालयाकडे तात्काळ अहवाल सादर केला होता. त्यांनी १३ फेब्रुवारी रोजी उत्पादन बंदीची अधिकृत मागणी केली होती.
अहवालानुसार, कंपनीच्या सांडपाण्यात २५,००० पेक्षा अधिक TDS, १५,००० पेक्षा अधिक COD आणि फक्त २ pH असल्याचे नमूद करण्यात आले आहे, जे पर्यावरणासाठी अत्यंत घातक आहे.
२४ एप्रिल रोजी MPCB ने अधिकृत आदेश देत कारखान्याचे उत्पादन तात्काळ बंद करण्याचे निर्देश दिले. दरम्यान, या कारखान्याला सायन कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून वाचविण्याचा प्रयत्न झाल्याचेही समोर आले आहे.
या रासायनिक सांडपाण्यामुळे परिसरातील शेती, ओढे, नाले, खाडी यांचं जलप्रदूषण झाले असून अनेक कूपनलिकांतून लाल, काळं आणि पिवळ्या रंगाचं पाणी येत असल्याने स्थानिक नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे.
Comments
Post a Comment