पहलगाम अतिरेकी हल्ल्यानंतर पालघर जिल्ह्यात सागरी सुरक्षा वाढवली
पहलगाम अतिरेकी हल्ल्यानंतर पालघर जिल्ह्यात सागरी सुरक्षा वाढवली
पालघर : पहलगाम येथे घडलेल्या अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यात सागरी सुरक्षेचे उपाय अधिक बळकट करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील सर्व सागरी पोलीस ठाण्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, गस्त व देखरेख अधिक तीव्र करण्यात आली आहे.
पालघर सागरी घटकात सध्या चार गस्त नौका असून, त्यापैकी एक नौका कार्यरत आहे आणि ती नियमित सागरी गस्त करत आहे. एक नौका स्थानिक दुरुस्तीदाराकडे दुरुस्तीसाठी दिली असून, उर्वरित दोन नौकांच्या आधुनिकीकरणासाठी शासनाने निधी मंजूर केला आहे. त्या दोन्ही नौकांचे दुरुस्ती काम सुरु आहे.
सुरक्षेच्या उपाययोजनेचा एक भाग म्हणून मत्स्यविभागाच्या सहकार्याने दोन ड्रोनच्या साहाय्याने खाडी किनाऱ्याची देखरेख केली जात आहे. या ड्रोन पेट्रोलिंगवर स्थानिक पोलीस ठाण्यांच्या माध्यमातून सतत लक्ष ठेवले जात आहे.
आवश्यकतेनुसार खाजगी बोटींचाही सागरी गस्तीसाठी वापर करण्यात येत आहे. तसेच भारतीय तटरक्षक दल, मत्स्यविभाग, महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड, कस्टम विभाग आणि पोलीस दल यांच्या संयुक्त सागरी गस्तीद्वारे सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत केली जात आहे.
सुरक्षा व्यवस्थेचा भाग म्हणून जिल्ह्यातील लँडिंग पॉइंट्स, कोस्टल पोस्ट्स आणि संवेदनशील ठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. पहलगाम घटनेनंतर जिल्ह्यातील सर्व सुरक्षा यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सागर रक्षक दल, सुरक्षा रक्षक, स्थानिक मच्छिमार सोसायट्या व मच्छिमार यांच्याशी संपर्क ठेवून, संशयास्पद हालचालींची माहिती तात्काळ पालघर नियंत्रण कक्ष व स्थानिक पोलीस ठाण्याला कळवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
Comments
Post a Comment