बोईसर मालवाहू यार्ड स्थलांतर प्रकरणावर जिल्हा प्रशासन अनभिज्ञ; चित्रालय परिसरात वाहतूक कोंडीची शक्यता
बोईसर मालवाहू यार्ड स्थलांतर प्रकरणावर जिल्हा प्रशासन अनभिज्ञ; चित्रालय परिसरात वाहतूक कोंडीची शक्यता
बोईसर – महिन्याला ८० ते १०० मालगाड्यांद्वारे स्टील व इतर अवजड वस्तूंची वाहतूक करणारे बोईसर रेल्वे स्थानकालगतचे मालवाहू यार्ड आता बोईसर पश्चिमेतील बीएआरसीच्या जुन्या गोडाऊनजवळ स्थलांतरित करण्याचे काम वेगात सुरू आहे. मात्र, या महत्त्वाच्या प्रकल्पाविषयी जिल्हा प्रशासन पूर्णपणे अनभिज्ञ असल्याचे समोर आले आहे, ज्यामुळे भविष्यात वाहतूक व्यवस्थेत अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे.
नवीन यार्ड कार्यरत झाल्यास ८० ते १०० ट्रेलर प्रतिदिन चित्रालय परिसरातून ये-जा करतील, ज्यामुळे या भागात प्रचंड वाहतूक कोंडी होणार आहे. सद्यस्थितीत मालवाहतुकीसाठी दोन यार्ड कार्यरत असून, त्यातून २२ टन वजनाच्या सुमारे १०० ते १२० स्टील कॉईल्सची वाहतूक केली जाते. या मालाची वाहतूक अवजड ट्रेलर्सद्वारे केली जाते, जे येत्या काळात नागरी भागांतून मार्ग काढतील.
याव्यतिरिक्त, प्रस्तावित यार्डच्या रेल्वे मार्गिकेवर तसेच चित्रालय रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून, यामुळे वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी रस्ते रुंदीकरण व भूसंपादन करावे लागणार आहे. मात्र, सध्या या संदर्भात कोणतीही ठोस हालचाल प्रशासनाकडून झालेली नाही.
मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी सांगितले की, नवीन यार्डात मालगाड्यांसाठी तीन फलाटांची व्यवस्था केली जात असून यामार्गे स्टील कॉईल्स व बीलेट्सची हाताळणी होईल. हे यार्ड पूर्वी बीएआरसीसाठी वापरण्यात आलेल्या जुन्या मार्गिकेवर उभारले जात आहे.
चित्रालय परिसरावर परिणाम
चित्रालय परिसर हा गजबजलेला व बाजारपेठ असलेला भाग असून, या भागात आधीच हॉकर व अतिक्रमणाचा त्रास आहे. यामध्ये आता अवजड वाहतुकीची भर पडल्यास अपघात व कोंडीचे प्रमाण वाढू शकते. या मार्गावरून तारापूर अणुऊर्जा केंद्राच्या आपत्कालीन सुविधा देखील कार्यरत असल्याने वाहतुकीची पुनर्रचना अत्यावश्यक आहे.
उद्योगांना भोगावे लागणार त्रास
सध्या टाटा स्टील, जेएसडब्ल्यू स्टील, करमतारा आदी उद्योग आपली मालवाहतूक थेट यार्डापर्यंत करत आहेत. नवीन यार्ड स्थापन झाल्यानंतर ही वाहतूक गजबजलेल्या नागरी भागातून वळवावी लागेल, ज्यामुळे वेळ, खर्च व धोका वाढण्याची शक्यता आहे. यासाठी औद्योगिक वसाहतीच्या रस्त्यांचे मजबुतीकरण व काँक्रीटीकरण करणेही गरजेचे ठरेल.
जिल्हा प्रशासनाची प्रतिक्रिया
या प्रकल्पासंदर्भात संपर्क साधल्यावर जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांनी सांगितले की, संबंधित विभागाकडून माहिती घेऊन आवश्यक त्या उपाययोजना आखण्यात येतील.
Comments
Post a Comment