महामार्गावर भीषण अपघात : NHAI च्या हलगर्जीपणामुळे दोघांचा मृत्यू
महामार्गावर भीषण अपघात : NHAI च्या हलगर्जीपणामुळे दोघांचा मृत्यू
डहाणू : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर रविवारी (९ मार्च) सकाळी ८.३० वाजता धानिवरी गावच्या हद्दीत भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत चेतन निकोले (२८, रा. कासा) आणि राणी सुरेश बोरसा (२१, रा. शेणसरी) या दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला.
◾महामार्गावरील अपूर्ण काम आणि हलगर्जीपणा जबाबदार
महामार्गावर सुरू असलेल्या पुलाच्या कामामुळे मुंबई लेनवरील वाहतूक गुजरात लेनवर वळवण्यात आली आहे. मात्र, या ठिकाणी डिव्हायडर चुकीच्या पद्धतीने बसवला गेला असून, सूचना फलकांचा अभाव आणि सिग्नलची गैरसोय आहे. यामुळे या भागात वारंवार अपघात होत आहेत.
अपघाताच्या वेळी चेतन निकोले आणि राणी बोरसा दुचाकीवरून प्रवास करत होते. मात्र, अचानक समोर आलेला डिव्हायडर स्पष्ट न दिसल्याने त्यांची दुचाकी धडकली. या धडकेनंतर दोघे रस्त्यावर पडले, त्याच वेळी भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना चिरडले, आणि जागीच मृत्यू झाला.
◾स्थानिक नागरिकांचा संताप; अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
या दुर्घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. चुकीच्या नियोजनामुळे सातत्याने अपघात होत असून, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
याप्रकरणी कासा पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उपजिल्हा रुग्णालय, कासा येथे पाठवले असून, पुढील तपास सुरू आहे.
Comments
Post a Comment