पालघर जिल्ह्यात कुपोषणाचा प्रश्न कायम; हजारो बालकांचे आरोग्य धोक्यात
पालघर जिल्ह्यात कुपोषणाचा प्रश्न कायम; हजारो बालकांचे आरोग्य धोक्यात
पालघर : ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर जिल्ह्याची स्थापना होऊन दहा वर्षे पूर्ण झाली असली, तरी अजूनही जिल्ह्यातील कुपोषणाची समस्या गंभीरच आहे. विशेषतः विक्रमगड, जव्हार, मोखाडा, वाडा, डहाणू, पालघर आणि वसई या तालुक्यांमध्ये कुपोषणाची स्थिती चिंताजनक असल्याचे महिला व बाल विकास विभागाच्या फेब्रुवारी २०२५ च्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
अहवालानुसार, जिल्ह्यात ३३ अती तीव्र कुपोषित (SAM) आणि ७१२ तीव्र कुपोषित (MAM) बालकांची नोंद झाली आहे. जव्हार (३३४), विक्रमगड (१३४) आणि मोखाडा (७६) या तालुक्यांमध्ये कुपोषित बालकांचे प्रमाण सर्वाधिक आहे.
आदिवासी भागांतील बालकांचे आरोग्य धोक्यात
पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, वाडा, विक्रमगड, डहाणू आणि तलासरी हे आदिवासीबहुल तालुके आहेत. येथील बहुतांश कुटुंबे शेती, मजुरी आणि जंगल संसाधनांवर अवलंबून आहेत. मात्र, रोजगाराच्या संधी कमी, आर्थिक दुर्बलता, अपुऱ्या आरोग्य सेवा आणि शिक्षणाचा अभाव यामुळे बालकांना योग्य पोषण मिळत नाही. परिणामी, जिल्ह्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर कुपोषणाची समस्या आढळते.
सरकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी अपयशी?
राज्य आणि केंद्र सरकार संपूर्ण पोषण अभियान (POSHAN Abhiyaan), एकात्मिक बाल विकास सेवा योजना (ICDS), मुख्यमंत्री पोषण आहार योजना, टिळक आहार योजना आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) यांसारख्या योजना राबवत असले, तरी त्यांची अंमलबजावणी प्रभावी होत नसल्याने लाभार्थ्यांपर्यंत पोषण सेवा पोहोचत नाहीत.
अंगणवाड्यांमध्ये पोषण आहार वेळेवर मिळत नाही,
आरोग्य तपासणी व उपचार सुविधा कमी आहेत, अशी तक्रार अनेक पालकांनी केली आहे. योजनांची कार्यक्षमता तपासण्याची आणि प्रशासनाला जबाबदार धरण्याची तातडीची गरज आहे.
कुपोषण रोखण्यासाठी आवश्यक उपाय
तज्ज्ञांच्या मते, कुपोषण कमी करण्यासाठी खालील उपाय त्वरित राबवणे गरजेचे आहे:
अंगणवाड्यांचे बळकटीकरण आणि नियमित निरीक्षण
अधिक आरोग्य तपासणी केंद्रांची उभारणी
पोषण आहार वेळेवर आणि योग्य प्रमाणात मिळावा यासाठी कठोर उपाययोजना
जनजागृती मोहिमा आणि पोषण शिक्षणावर भर
आदिवासी भागांत माता-बालकांसाठी विशेष पोषण सेवा उपलब्ध करणे
कुपोषणाचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता
दहा वर्षांनंतरही पालघर जिल्ह्यातील कुपोषणाचा प्रश्न कायम आहे, ही बाब अत्यंत गंभीर आहे. जर वेळीच ठोस पावले उचलली नाहीत, तर परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता आहे. स्थानिक प्रशासन आणि राज्य सरकारने योजनांची काटेकोर अंमलबजावणी करून कुपोषणावर प्रभावी उपाय करणे अत्यावश्यक आहे.
तालुकानिहाय कुपोषण स्थिती:
अती तीव्र कुपोषित बालक (SAM) सर्वाधिक:
कासा – ७
मोखाडा – ६
वाडा २ – ४
जव्हार १ – ३
जव्हार २ – ३
विक्रमगड – ३
मनोर – २
वसई – २
वाडा १ – २
तलासरी – १
तीव्र कुपोषित बालक (MAM) सर्वाधिक:
जव्हार १ – १९६
जव्हार २ – १३८
विक्रमगड – १३४
मोखाडा – ७०
वाडा १ – ४७
वाडा २ – ४४
मनोर – २७
डहाणू – २१
कासा – २०
पालघर – १०
वसई – १३
Comments
Post a Comment