चित्रालय येथे ट्रान्सफॉर्मरखाली थाटलेली बाजारपेठ धोकादायक ;महावितरण विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष

चित्रालय येथे ट्रान्सफॉर्मरखाली थाटलेली बाजारपेठ धोकादायक ;महावितरण विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष


बोईसर - बोईसर शहरातील बोईसर–तारापूर मुख्य रस्त्यावर चित्रालय परिसरात महावितरणच्या उघड्या ट्रान्सफॉर्मरखाली सर्रासपणे बाजारपेठ थाटण्यात आली आहे. प्लास्टिकच्या ताडपत्र्यांनी झाकून या ठिकाणी दुकाने, स्टॉल्स, खेळणी विक्रेते आणि विविध वस्तू विकणारे फेरीवाले व्यापार करत असल्याचे चित्र दिसून येते. परिणामी, या ठिकाणी सार्वजनिक सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

या ट्रान्सफॉर्मरच्या अवतीभवती मोठ्या प्रमाणावर वायरिंग असून, त्यामध्ये कोणत्याही क्षणी शॉर्टसर्किट होण्याचा धोका आहे. नागरिक, महिला आणि लहान मुले या मार्गावरून दररोज मोठ्या संख्येने प्रवास करतात. त्यामुळे याठिकाणी अपघात घडल्यास जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.


स्थानिक रहिवाशांच्या मते, गेल्या अनेक वर्षांपासून येथे असेच अतिक्रमण सुरू असून महावितरण विभागाने याकडे डोळेझाक केली आहे. काही वेळा विभागाचे कर्मचारी आले तरी केवळ पाहणी करून निघून जातात, अशी तक्रार नागरिकांनी केली आहे. या प्रकरणातील गोंधळ आणि हलगर्जीपणामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप पसरला आहे.


पावसाळा तोंडावर असताना धोका अधिक वाढला


लवकरच पावसाळा सुरू होणार असल्यामुळे ट्रान्सफॉर्मर आणि त्याखालील प्लास्टिकच्या ताडपत्रीची दुकाने ही अधिकच धोकादायक ठरणार आहेत. ओल्या हवामानात विजेचा प्रवाह जमिनीत पसरण्याची शक्यता वाढते. त्यामुळे या परिसरात भिजलेल्या जमिनीतून विद्युत प्रवाह होऊन संभाव्य अपघात होण्याचा धोका अधिक गडद झाला आहे.


जवाबदारी नाकारता येणार नाही


 मुख्य वाहतुकीचा रस्ता असल्यामुळे सतत गर्दी असते. कोणताही अपघात घडल्यास त्याची जबाबदारी महावितरण विभागावरच येईल, असा इशारा रहिवाशांनी दिला आहे. प्रशासन आणि महावितरण विभागाने तातडीने कारवाई करून अतिक्रमण हटवावे आणि सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी नागरिकांची जोरदार मागणी आहे.


◾अतिक्रमण, विद्युत धोक्यांवर कोणाचे नियंत्रण?


बोईसरसारख्या विकसित होत असलेल्या शहरात सार्वजनिक सुरक्षेच्या बाबतीत असे बेपर्वा धोरण प्रशासन आणि महावितरण विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करते. उघड्या ट्रान्सफॉर्मरखाली थेट दुकाने थाटल्या जाणे म्हणजे नियमांची सर्रास पायमल्ली होय. नागरिकांच्या जिवावर बेतू शकणाऱ्या अशा प्रकारांकडे प्रशासनाने केवळ दुर्लक्ष करणे ही अत्यंत गंभीर बाब आहे




Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

आंबटगोड मैदानातील खून प्रकरणाचा उलगडा; सात जणांना अटक

रेल्वे रुळ ओलांडताना ट्रेनच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू