घरगुती हिंसाचाराचा भीषण शेवट – मुलाने केला पित्याचा खून"
घरगुती हिंसाचाराचा भीषण शेवट – मुलाने केला पित्याचा खून"
पालघर : पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात एक धक्कादायक व मन हेलावणारी घटना समोर आली आहे. हाडळपाडा, वारनोळ येथे राहणाऱ्या २१ वर्षीय तरुणाने आपल्या वडिलांचा कु-हाडीने खून केल्याची घटना २० मे २०२५ रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. केवळ खूनच नव्हे, तर त्यानंतर आरोपीने मृतदेहावर अंत्यविधी करून खूनाचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
अक्षय विलास हाडळ (वय २१) हा आपल्या आई-वडिलांसोबत हाडळपाडा, वारनोळ येथे राहत होता. त्याचे वडील, विलास द्वारकानाथ हाडळ (वय ४५) हे पत्नी जयश्री हिला नेहमी शिवीगाळ करत व शारीरिक मारहाण करीत असत. या घरगुती हिंसाचाराला कंटाळलेल्या अक्षयने २० मे रोजी वडील आईवर हल्ला करण्यासाठी कु-हाड घेऊन धावले असताना मध्यस्थी केली. यावेळी त्याने वडिलांच्या हातातील कु-हाड हिसकावून घेतली आणि संतप्त अवस्थेत त्यांच्या मानेवर दोन जोरदार घाव घालून त्यांचा जागीच खून केला.
खूनानंतर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न
घटना घडताच आरोपीने गावातील इतर नातेवाईक व गावकऱ्यांना धमकावून पोलीस अथवा प्रशासनाला माहिती देण्यापासून रोखले. त्यानंतर त्याने घरच्यांच्या मदतीने मृतदेहावर अंत्यविधी करून प्रेत जाळले. इतकेच नव्हे, तर खून करण्यासाठी वापरलेली कु-हाड देखील प्रेतासोबत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. घटनास्थळी असलेले रक्ताचे डागही शेण सारवून पूर्णपणे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
पोलीसांनी उघडकीस आणले प्रकरण
या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर वाडा पोलीस ठाण्याचे पोउपनि मयुरेश नामदेव अंबाजी यांनी तात्काळ तपास सुरू केला. अधिक तपासात आरोपीकडून सर्व प्रकारची कबुली मिळाली. त्यानंतर गुन्हा क्रमांक २२८/२०२५ नुसार भारतीय दंड विधान कलम ३०२ (खून) आणि २०१ (पुरावे नष्ट करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
२४ मे रोजी रात्री १२.४५ वाजता अक्षय हाडळ याला अटक करण्यात आली असून, पोलीस अधिक तपास करीत आहेत. या घटनेने संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे. घरगुती हिंसाचाराचे रूपांतर एका गंभीर गुन्ह्यात झाले असून, ही बाब समाजात घराघरातील शांततेच्या प्रश्नावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरत आहे.
Comments
Post a Comment