पालघर जिल्हा मुख्यालयात बॉम्ब ठेवल्याचा निनावी ईमेल; प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क
पालघर जिल्हा मुख्यालयात बॉम्ब ठेवल्याचा निनावी ईमेल; प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क
पालघर : पालघर जिल्हाधिकारी कार्यालय संकुलात बॉम्ब ठेवल्याचा निनावी ईमेल आज सकाळी प्राप्त झाल्यानंतर प्रशासन व सुरक्षायंत्रणांमध्ये खळबळ उडाली. सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयात हा ईमेल आला. सुरुवातीला हा इशारा खोटा असण्याची शक्यता वर्तवली जात होती, मात्र तपासणीअंती ईमेल खरा असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले.
त्यानंतर जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन, पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा तातडीने सक्रिय झाल्या. संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालय, दोन्ही प्रशासकीय इमारती व जिल्हा परिषद कार्यालय रिकामे करण्यात आले असून, अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांना सुरक्षित अंतरावर हलवण्यात आले आहे.
घटनास्थळी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून, बॉम्ब शोध पथक, डॉग स्कॉड, रॅपिड अॅक्शन फोर्स आणि इतर सुरक्षा यंत्रणा कार्यरत आहेत. तसेच, एनडीआरएफचे पथकही घटनास्थळी दाखल झाले आहे. संपूर्ण परिसराची कसून झडती सुरू असून, जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
प्राथमिक तपासात, हा मॉक ड्रिल असल्याची शंका व्यक्त करण्यात आली होती. मात्र निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे यांनी हा खरोखर निनावी धमकी ईमेल असल्याची माहिती दिली आहे. सावधगिरीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने आपत्कालीन आराखड्यानुसार सर्व आवश्यक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
तारापूर अणुऊर्जा केंद्र आणि इतर संवेदनशील ठिकाणांच्या पार्श्वभूमीवर ही धमकी गंभीर मानली जात असून, तपास यंत्रणांकडून मेल पाठवणाऱ्याचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून, प्रशासनाने अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीची वाट पाहण्याचे आवाहन केले आहे.
Comments
Post a Comment